Friday, November 2, 2007

"सी-फूड'चा शौकीन


ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटे याच्या मुलाखतीवर आधारित लेख इथे देत आहे. तुमच्या प्रतिक्रिया अवश्‍य कळवा.
----------------------

""वेगवेगळ्या कारणांनी सहा-सहा महिने घराबाहेर राहावं लागत असल्यानं खाण्याबाबत फार काही आवडी-निवडी ठेवून चालत नाही. उलट, जे समोर येईल ते आवडीनं खावं लागतं. त्यातही कोळंबी आणि माशांचे पदार्थ मिळाले तर जेवायला मजा येते...'' बुद्धिबळातील चौसष्ट घरांचा "राजा' ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटेने स्वतःच्या आवडी-निवडींचा "पट' मांडला. शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसाहारी पदार्थच अभिजितला विशेष प्रिय. त्यामध्ये झिंगे, कोळंबी, पापलेट अशा सागरी खाद्यपदार्थांचा समावेश. एरंडवण्यातील "निसर्ग' रेस्तरॉंमध्ये हे पदार्थ खाण्यासाठी वरचेवर जाणं होत असल्याचंही तो सांगतो.

बुद्धिबळात कोणतीही चाल खेळण्यापूर्वी विचार करणाऱ्या अभिजितला खाण्याबद्दल बोलताना फारसा विचार करावा लागत नाही. एकामागून एक आवडीचे पदार्थ तो सांगत जातो. घरात आईनं केलेली पुरणपोळी हा त्याचा आवडता पदार्थ. तशी पुरणपोळी कोणीही केली असली तरी त्याला आवडतेच; पण आईनं केलेली असेल तर त्याच्यासाठी दुधात केशरच! बायकोनं केलेला कोणता पदार्थ आवडतो, असं विचारलं, तर सगळंच आवडतं, असं सांगून ती डोसा फारच छान करते, असं तो सांगतो. स्वतःवर काही करण्याची वेळ आलीच, तर "मॅगी' करून खायला त्याला आवडते. दुसरं काहीच तयार करता येत नसल्यानं एवढा एकच पर्याय त्याच्यासाठी उपलब्ध असतो.

"वीकएण्ड'ला खाण्यानिमित्त बाहेर जाण्याची अभिजितला मनापासून आवड. पुण्यात असेल तर त्याची पहिली पसंती असते फर्ग्युसन रस्त्यावरील "वैशाली'ला. त्याच्या मते तिथला "ऍम्बियन्स' खूपच छान. महाविद्यालयात असल्यापासून त्याला "वैशाली'त जाण्याची सवय आहे. तिथला उडीदवडा-सांबार हा त्याचा सर्वाधिक आवडता पदार्थ. वेगवेगळे देश फिरून आलेल्या अभिजितचे भारताबाहेरही खाण्याचे खास "अड्डे' आहेत. झेक प्रजासत्ताकमधील पारडुबिस शहरात मिळणारा "चीज ब्रोकोली' आणि सिडनीमधील "स्क्विड्‌स' हे त्याचे आवडते पदार्थ. पाश्‍चात्त्य देशांमध्ये मसाल्याचा वापर खूप कमी असतो. त्यामुळे सुरवातीला तिथले पदार्थ नकोसे वाटतात. पण एकदा सवय झाली, की ते पदार्थही आपण आवडीने खाऊ लागतो, असा अभिजितचा अनुभव.

Friday, October 26, 2007

साबूदाणा खिचडी आणि लखनवी चिकन!



अभिनेत्री अमृता सुभाष हिच्या खाण्याच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी मी नुकतीच तिची एक मुलाखत घेतली. ती इथे देत आहे. तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
-------------------------

""पदार्थ बनविणाऱ्याच्या हाताला असलेली चव आणि त्याचं प्रेम यामुळेच तो पदार्थ जास्त चविष्ट होतो. पाककलेपेक्षा या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. त्यामुळेच आईच्या हातचं लखनवी चिकन आणि सासूबाईंनी केलेली आमटी आणि कढी या पदार्थांना असणारी चव दुसऱ्या कशालाच नाही...'' रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सर्वच प्रांतांत कसदार अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री अमृता सुभाष तिच्या खाण्याच्या आवडीनिवडी "शेअर' करत होती. शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारांत अमृताचे काही विशेष आवडीचे पदार्थ आहेत आणि ते मिळण्याची ठिकाणंही अगदी खासच. त्यात पुण्याच्या "कल्पना भेळ'पासून ते दिल्लीतील वेगवेगळ्या ढाब्यांवर मिळणाऱ्या शाही पनीरपर्यंतचा समावेश. या सगळ्यांमध्ये तिला सर्वांत जास्त आवडते, ती साबूदाण्याची खिचडी. खिचडीवर इतकं प्रेम, की तिला लहानपणी स्वप्नंही खिचडीचीच पडायची म्हणे! अमृता घरी येणार असल्याचं कळलं, की अजूनही तिचे नातलग आदल्या दिवशीच साबूदाणा भिजवून ठेवतात.

भेळ हा अमृताचा आणखी एक आवडीचा पदार्थ. "पुण्यातील "कल्पना', "पुष्करणी' आणि "गणेश' या ठिकाणी जशी भेळ मिळते, तशी भेळ जगात कुठंच मिळत नाही,' असं तिचं अगदी ठाम मत. त्यातही "कल्पना भेळे'ची आठवण निघाली की ती "नॉस्टॅल्जिक' होते आणि मग स. प. महाविद्यालयातील दिवस, तिच्या मित्रमैत्रिणी, कला मंडळचा ग्रुप या सगळ्या आठवणी ताज्या होतात. भेळीच्या गाडीवर कांदा, कोथिंबीर कापताना नुसतं बघितलं तरी अमृताच्या तोंडाला पाणी सुटतं. मुंबईत सगळं काही मिळत असलं तरी तिथं चांगली भेळ मिळत नाही, अशी तिची खंत. भविष्यात स्वतःची भेळेची गाडी सुरू करायला आवडेल, असंही ती गमतीत सांगते.

लखनवी चिकन, कोळंबी मसाला आणि माशांचे इतर सगळे खाद्यपदार्थ अमृताला विशेष प्रिय. कोळंबी मसाला स्वतः तयार करून घरच्यांना खाऊ घालणंही तिला आवडतं. त्यासाठी मुंबईत कोळंबी विकत घेण्याचं दुकानही ठरलेलं. मांसाहारी प्रकारातील सगळेच खाद्यपदार्थ करायला आणि खायला तिला आवडतात. पुण्यातील "पुरेपूर कोल्हापूर' हॉटेलमधील मांसाहारी थाळी आणि सोबत पांढऱ्या रश्‍शामुळं तोंडाला चव येते, असं अमृता सांगते.

आम्रखंड, सासूबाईंनी केलेले मोदक आणि गाजराचा हलवा हे अमृताच्या आवडीचे गोड पदार्थ. दिल्लीतील बंगाली मार्केटमध्ये मिळणारा "आलू की टिक्की' हा पदार्थ आणि सगळ्याच प्रकारचे पराठे यांचा एकदा तरी प्रत्येकानं आस्वाद घेतला पाहिजे, असं तिला वाटतं. एकूणच, वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणारी अमृता पक्की खवय्यीही आहे, असं तिच्याशी झालेल्या संवादातून जाणवत राहतं.

Friday, October 19, 2007

पालेभाज्यांच्या प्रेमात प्रशांत!


मराठी रंगभूमीवरील आघाडीचा अभिनेता प्रशांत दामले याच्या खाण्याच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी मी नुकतीच त्याची एक मुलाखत घेतली. त्यावर आधारित लेख सोबत देत आहे. तुम्हाला तो निश्‍चित आवडेल आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला सांगाल, अशी अपेक्षा ठेवतो.

---------------

""मेथीच्या पिठ पेरून केलेल्या भाजीसोबत भाकरी, कांदा, लसणाची चटणी आणि तळलेली मिरची असा फक्कड बेत मला पंचपक्वानांपेक्षा जास्त आवडतो. पालेभाजी कोणतीही असो, अंबाडी, पालक, करडई, चवळी, तांदळी, राजगिरा मला आवडतेच. फक्त शेपूच आणि माझं वाकड आहे. शेपू खालं की घसरून पडल्यासारखं वाटतं...'' आजच्या घडीचा मराठी रंगभूमीवरील आघाडीचा अभिनेता प्रशांत दामले त्याच्या नेहमीच्या शैलीत बोलत होता. "आम्ही सारे खवय्ये' मालिकेतून प्रेक्षकांच्या "किचन'मध्ये पोचलेल्या प्रशांतला स्वतःला काय खायला आवडतं, हे अगदी दिलखुलासपणे तो सांगत होता. पालेभाज्यांवर प्रशांतच विशेष प्रेम असल्याचं त्याच्याशी बोलताना सातत्यानं जाणवतं. डाळ-तांदळाच्या कण्या घालून बायकोनं केलेली अंबाडीची भाजी प्रशांतला विशेष प्रिय.

रंगभूमीवर असताना अभिनयात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी दक्ष असलेल्या प्रशांतला घरी जेवतानाही सगळं साग्रसंगीतच लागतं. पानात भाजी कोणतीही असू दे पण त्यातले इनग्रेडियंट, मसाले अगदी कोंथिबीर-खोबऱ्यापासून ते आलं-लसणाच्या पेस्टपर्यंत सगळं अगदी प्रमाणात आणि परिपूर्ण हवं. त्याशिवाय जेवायला मजा येत नाही, असं त्याचं अगदी स्पष्ट मतं. कोणताही पदार्थ एक चमचा तेलातही होतो आणि चार चमचे तेलातही बनवता येतो. पण सध्या एक चमचा तेलात केलेले पदार्थ खाणं त्याला जास्त पसंत आहे. घरात आणि बाहेरही शाकाहरी जेवणच तो जास्त "प्रेफर' करतो.

दौऱ्यांच्या निमित्तानं त्याचं सतत बाहेरगावी जाणं होतं, अशावेळी शक्‍यतो तो ज्या हॉटेलवर उतरतो तिथेचं खातो. त्यामुळं पुण्यामध्ये असतानाही खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाणं होत नाही. कधी वेळ आलीच तर गरमागरम उपमा आणि कडकडीत भूक लागली असेल तर उत्ताप्पा अशाच "डिशेस' खायला आवडतात. उत्ताप्प्यामुळं पोट भरल्यासारंख वाटत असल्याचं प्रशांत सांगतो. जिलेबी आणि आमरस या प्रशांतच्या "फेव्हरिट स्वीट डिश'. पुण्यात कोणाच्याही लग्नाला आलं की जिलेबीचा बेत असेल तर स्वारी खूष.

रंगभूमीवर किंवा चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करणारा प्रशांत कधीकधी घरीही "शेफ'ची भूमिका बजावतो. फ्लॉवर, मटार, बटाटा, टोमॅटो घालून केलेला खास "प्रशांत स्टाईल कुर्मा' त्याच्या घरातील सगळ्यांनाच आवडतो. भविष्यात कधी स्वतःच हॉटेल काढलंच तर तिथं फक्त अस्सल महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन पदार्थच ठेवेन, पंजाबी जेवण आवडणाऱ्यांना तिथं "नो एंट्री' असेल, असं प्रशांत अगदी ठासून सांगतो.

सतत धावपळीच्या जीवनात काही गोष्टी तो अगदी कटाक्षानं पाळतो. सकाळचं जेवण अकरा वाजता घेऊनच घरातनं बाहेर पडतो. कुठही जेवताना कोशिंबीर पानात असलीच पाहिजे. सोबत तोंडाला चव येण्यासाठी लोणचं हवंच. कडकडीत भूक लागेपर्यंत काहीच खायचं नाही. या सगळ्या सवयींमुळंच प्रशांतन स्वतःला सतत "फिट' ठेवलयं.

--------------

Wednesday, October 10, 2007

आपण बदललो आहोत...

परवा संध्याकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो. सध्याच्या माध्यमांवर भाष्य करणारा कार्यक्रम असल्यानं त्याला पुणेकारांचा प्रतिसादही मोठा होता. पत्रकारितेत काम करणारी आणि या क्षेत्रात येऊ घातलेली पिढी आवर्जुन कार्यक्रमाला उपस्थित होती. अपेक्षेप्रमाणं कार्यक्रम रंगतदार झाला. प्रथेप्रमाणं काही पुणेकरांनी आवश्‍यक आणि अनावश्‍यक प्रश्‍नही विचारले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानानं होणार असल्याचं आयोजकांनी आधीच जाहीर केलं होतं. त्याप्रमाणं प्रश्‍नोत्तरे आटोपल्यानंतर पसायदान सुरू झाले. सभागृहात उपस्थित असलेले सर्वजण प्रथेप्रमाणं उभे राहिले. मी ही उभा होतोच. तसं पसायदान माझ्यासाठी नवं नाही पण त्यादिवशी ते ऐकताना अचानक अंगावर काटा आला आणि लगेचच हे असं का होतंय, असा विचार मनात घोळू लागला.

शाळेमध्ये दिवसाचा शेवट रोज पसायदानानंच व्हायचा. तेव्हा कधी एकदा हे पसायदान संपतंय आणि दप्तर घेऊन घराकडं पळतो, असं झालेलं असायचं. शाळा सुटण्याआधीची शेवटची पाच-दहा मिनिटंही काही तासांइतकी वाटायची आणि परवा तर चक्क असं वाटत होतं की पसायदान संपूच नये. पण मला वाटलं म्हणून तसं काही घडणार नव्हतं. पसायदान संपलं कार्यक्रमही संपला. आम्ही आपलं गाडी काढून घराची वाट पकडली. पण एक प्रश्‍न मी सतत मलाच विचारत होतो की, आज पसायदान ऐकताना अंगावर काटा का आला? हल्ली असं फार कमी वेळा होतं. एखादी घटना आपल्यासमोर घडते. एखादी चित्रविचित्र बातमी वाचयला मिळते. नातेवाईकांबद्दलची एखादी चांगली वाईट घटना कानावर पडते. पण आपण मात्र मन बोथट झाल्याप्रमाणं तिला सामोरं जातो. एखादी चांगली घटना घडली तर आनंदही होतो आणि एखादी वाईट गोष्ट कानावर पडली दुःखही होतं. पण हे सगळं अगदी वरवरून होतं. मनातील किंवा शरीरातील एखाद्या खोलवर असलेल्या बिंदूपासून आपल्याला वाईट वाटत नाही. त्यामुळं अंगावर काटाही येत नाही. या सगळ्याला चांगलंच सरसावलेलो असतो आपण.

गावांच शहर आणि शहरांच महानगर झाल्यापासून सगळं अगदी बदलून गेलेयं. घड्याळ्याच्या काट्यावर आधारित काटेकोर जीवनपद्धती स्वीकारल्यापासून उपजत भावना मरून गेल्या आहेत. आजूबाजूला कायं घडतंय, याबद्दल विचार करायला वेळ कुणाला आहे. घरातीलच एखादं काम करण्यासाठी हल्ली वेळ काढायला लागतो. हे चांगल की वाईट, हे कोणीच सांगू शकणार नाही. यातून मागेही फिरता येणार नाही. पण कधी कधी अंगावर काटा आला की आपण जिवंत असल्याचं जाणवतं. तिथून पुढं थोडावेळ मनात विचारांची गर्दीही होते. माझ्यासारखी काहीजण विचारांमधून निर्माण झालेल्या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात तर काही मात्र प्रश्‍न पडण्याअगोदरच वेगळ्याच स्वप्नात रंगून जातात. मागं म्हटल्याप्रमाणं कोण बरोबर कोण चूक हे ठरवात येणार नाही आणि आपण ठरवूही नये. आपण बदललो आहोत किंवा बदलतो आहोत. एवढं जाणवलं तरी पुष्कळ झालं.

Tuesday, September 11, 2007

...निरर्थक घोषणांच्या देशा!

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा ा ध्रु ा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा...

कवी राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांनी लिहिलेल्या या महाराष्ट्रगीतातील या काही पंक्ती वाचल्या आणि सध्याचे देशातील सर्वच कार्यकारी, अकार्यकारी, "रिमोट कंट्रोल' वापरणाऱ्या किंवा न वापरणाऱ्या नेत्यांची भाषणं ऐकली की या पंक्ती अपुऱ्या वाटू लागतात.
"राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा'च्या बरोबरीन आता
"निरर्थक घोषणांच्या आणि भूलथापांच्या देशा' असं म्हणण्याची वेळ आली आहे, असं जाणवू लागतं.

स्वातंत्र्याचा हीरकमहोत्सव गेल्याच महिन्यात सर्व भारतीयांनी मोठ्या उत्साहानं साजरा केला. 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या साठ वर्षांतील प्रवासाकडं मागं वळून पाहिलं तर काही गोष्टी निश्‍चितच खटकतात. त्यापैकीच नेत्यांच्या निरर्थक घोषणांचा आढावा या लेखात घेण्याचा विचार आहे.

माझ्यासारखंच तुमच्या अनेकांचा दिवस वृत्तपत्रांच्या वाचनानं सुरू होतं असणार, यात शंका नाही. यातील काही शीर्षकं बातमीकडं लक्ष वेधून घेणारी असतात तर काही शीर्षक वाचली की आपण त्या बातमीत पुढं काय लिहिलं आहे हे अगदी सहज ओळखू शकतो, इतपत अंगवळणी पडलेली असतात.

विकासाची फळं सर्वसामान्यांपर्यंत पोचली पाहिजेत

गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी झाली पाहिजे

गरिबी हटाओ

विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना सामावून घेणं गरजेचं

सामान्य माणसाचं भलं झालं पाहिजे

ही अशीच काही वाक्‍य. कोणताच अर्थ नसलेली. केवळ देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तिंनी या ओळींचा किंवा वाक्‍यांचा आपल्या भाषणात उल्लेख केलेला असतो, म्हणूनच मग वृत्तपत्रांनाही ती छापणं टाळता येत नाही. तसं बघायला गेलं तर साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या कोणत्याही देशातील नेत्याच्या तोंडी न शोभणारी अशीच ही सगळी वाक्‍य. यामागे विचार आहे, असं म्हणावं इतकीपण त्यामध्ये ताकद नाही.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला. सामान्यातील सामान्य माणसाचं कल्याण झालं पाहिजे. त्याला आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असला पाहिजे, असं या व्यवस्थेचं मूलभूत तत्त्व. तरीपण आज देशातील सगळेच उच्चपदस्थ पुढारी आपला खोटारडेपणा लपविण्यासाठी दिशाभूल करणाऱ्या घोषणांचा वापर करतात. देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी निर्णय घेण्याचे अधिकार राज्यघटनेनं कायदे मंडळाला दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे काम कार्यकारी मंडळावर सोपवलं आहे. सामान्य माणसाचं कल्याण व्हावं, यासाठी आवश्‍यक ते कायदं करणं, त्यांच्या अंमलबजावणीसाठी व्यवस्था उभारणं, उभारलेली व्यवस्था कार्यक्षमपणे काम करते आहे की नाही याची खातरजमा करणं, परिस्थितीनुरुप व्यवस्थेत बदल करणं ही सगळी काम करण्यासाठीच कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ आणि न्यायमंडळ या तिन्हींची निर्मिती करण्यात आली.

राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, विविध पक्षांचे उच्चपदस्थ अधिकारी, राज्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळ यासर्वांमध्ये विविध भूमिका बजावणाऱ्या व्यक्ती या वाक्‍यांचा सर्रास वापर आपल्या भाषणात करतात. आपल्यापुढं कोणता श्रोतृगण बसला आहे त्यांचं वय, लिंग, आर्थिक ताकद, समजून घेण्याची कुवत या कशाचाही सारासार विचार न करता "दे ठोकून' या एकाच विचारानं ही मिळमिळीत आणि संदर्भहिन वाक्‍य ते वापरतात.

खरंतर विकासाची फळं सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचं काम पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांनीच केलं पाहिजे. देशातील प्रशासकीय व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी तेच असतात. असं असताना जर पंतप्रधान एखाद्या जाहीर भाषणात म्हणत असतील की सामान्य माणसाचं भलं झालं पाहिजे, तर माझ्या मते याला काहीच अर्थ नाही. उद्या एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचे अध्यक्ष तेथील शिपायांना उद्देशून केलेल्या भाषणात कंपनीची प्रगती झाली पाहिजे, पगारवाढ सगळ्यांना योग्यप्रमाणात मिळाली पाहिजे, असं सांगणार असतील तर त्याला काहीच अर्थ नाही. कारण हे सगळं नीट होतं आहे की नाही, हे पाहण्यासाठीच तर अध्यक्षांना तिथं बसवलं आहे. नुसता बोलघेवडेपणा करण्यात काहीच अर्थ नाही.

सामान्य माणसाचं भलं झालं पाहिजे, हे सगळ्यांनाच पटतं. पण कोणी करायचं हे भलं, कसं करायचं, त्यासाठी सामान्य माणसांनी काय करायला हवं, इतर गटांनी यात कसा सहभाग घेतला पाहिजे, हे काहीच स्पष्ट न करता नुसतं "सामान्यांचं भलं झाल पाहिजे' असं एखाद वाक्‍य आपल्या भाषणात वापरल की झालं. अशीच नुसती वाक्‍य वापरून आपलं सरकार सामान्यांच्या कल्याणासाठी कसं कटिबद्ध आहे, हे सांगण्याच्या धडपडीत सारेचजण असतात.

एकीकडं विकासाचा वेग वाढत असताना दुसरीकडं सर्वोच्च पदावरील नेत्यांना "गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी झाली पाहिजे, असं सांगावं लागणं ही खरंतर त्यांची हार आहे. साठ वर्षांच्या काळात आपण इतकी सक्षम व्यवस्थाही निर्माण करू शकलेलो नाही की ज्यामुळं आपोआप विकासाची फळं सर्वसामान्यांपर्यंत पोचतील. व्यवस्थेमुळंच हे सर्वकाही साध्य होईल, असं नाही. मात्र, व्यवस्था बळकट आणि सक्षम असलीच पाहिजे. ई-क्रांतीच्या युगात अशा बाष्कळ वाक्‍यांना काहीच अर्थ नाही. संवादात नेमकेपणा आलाच पाहिजे, मग तो कोणताही संवाद असू द्या. नुसतं "विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना सामावून घ्या' असं म्हणून चालणार नाही तर यासाठी सरकार म्हणून आम्ही काय करतो आहोत आणि नागरिक म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, हे स्पष्टपणे सांगितलं तरच त्याचा सगळ्यांना फायदा होईल. देशातील नेत्यांना ही सुबुद्धी व्हावी, हीच अपेक्षा.

Friday, September 7, 2007

हास्यास्पद निर्णयांची मालिका!


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वादग्रस्त विधेयकाला बुधवारी लोकसभेनं मंजुरी दिली. आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या काही वर्षांपासून अनेक वादग्रस्त विधेयकं संसदेमध्ये मांडण्यात आली. त्यावर माध्यमांमध्ये आणि सामान्यजनांमध्येही चर्चा झाली. यासर्व निर्णयांचे प्रमुख शिल्पकार आहेत, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. अंबुमणी रामदास.

सिगारेटच्या पाकिटांवर कॅन्सरग्रस्त रुग्णांची, दातांना आणि घशाला होणाऱ्या विविध रोगांची घृणास्पद छायाचित्रं छापण्याचं बंधन घालणारं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. याबरोबरच सिगारेटच्या
पाकिटांवर मानवी कवटीचे छायाचित्र छापणेही उत्पादकांसाठी बंधनकारक करण्यात आलं आहे. अशा प्रकारचे हास्यास्पद निर्णय घेण्यात डॉ. रामदास आघाडीवर आहेत. धूम्रपानाच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात तसं गैर काहीच नाही पण, यामागची भूमिका स्पष्ट असली पाहिजे. डॉ. रामदास यांनी घेतलेल्या निर्णयामागे कोणताही अभ्यास नसल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होतं. यामुळेच त्यांची अनेक विधेयकं वादग्रस्त ठरली आहेत.

चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील धूम्रपानाच्या दृश्‍यांवर बंदी घालण्याचा निर्णय डॉ. रामदास यांनी 2005मध्ये घेतला. याची अजूनपर्यंत तरी अंमलबजावणी झालेली नाही. त्यावेळीही या विधेयकावरून बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर त्यांनी सिगारेटच्या पाकिटावर किमान 50 टक्के भागात सावधानतेचा इशारा छापण्याचे आदेश दिले. घरामध्ये धूम्रपान करताना गृहिणीची परवानगी घेण्याचा हास्यास्पद निर्णयही डॉ. रामदास यांनी घेतला. या सर्व निर्णयांचा, विधेयकांचा, कायद्यांचा नीट अभ्यास केला की त्यामधील फसगत अगदी सहजपणे स्पष्ट होते.

भारतात जम्मू-काश्‍मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सर्व ठिकाणची परिस्थिती एकसारखी नाही. शहरातील आणि ग्रामीण भागातील स्थितीमध्ये खूप फरक आहे. नागरिकांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्थितीमध्येही फरक आहे. त्यामुळं दिल्लीत बसून सगळ्यांना समान लेखून सरसकट निर्णय घेणं, ही भूमिकाच माझ्यामते मूर्खपणाची आहे. या सगळ्या निर्णयांचे अंतिम ध्येय लोकांनी धूम्रपानापासून परावृत्त व्हावं किंवा धूम्रपान कमी करावं, हे आहे. डॉ. रामदास यांच्या निर्णयामुळं हे ध्येय साध्य होईल, असं मुळीच वाटत नाही. तुम्ही जर बारकाईन निरिक्षण केलं तर सध्या किती लोक सिगारेटचे पूर्ण पाकिट एकाचवेळी विकत घेतात? पूर्ण पाकिट विकत घेण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. बरं, जे पूर्ण पाकिट विकत घेतात त्यांना फक्त आपल्या ब्रॅंडशीच घेणंदेणं असतं. त्या पाकिटावर काय लिहिलं आहे किंवा त्यावर कोणती छायाचित्रं छापली आहेत, हे बघत बसण्यास त्याच्याकडं वेळही नसतो आणि त्यांना त्यात इंटरेस्टही नसतो. अशा सर्व परिस्थितीत "पाकिटावर धूम्रपान करणे, हे आरोग्यास अपायकारक आहे' हे अगदी शंभर पाईंटात लिहिलं तरी त्याचा काहीच उपयोग नाही.

घरात धूम्रपान करताना महिलेची परवानगी घ्या, हा निर्णय तर मूर्खपणाचा कहर आहे. भारतातील किती घरात महिलांच्या शब्दाला किंमत आहे किंवा महिला सांगेल त्याप्रमाणं नवरेमंडळी ऐकतात? घरांमध्ये महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, असं माझं मुळीच मत नाही पण एकूणच पुरुषमंडळी महिलांचं फारच कमी ऐकतात, हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळं अशा स्वरुपाच्या निर्णयाचा किती उपयोग होईल, हे सांगता येत नाही.

चित्रपटातीत किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील धूम्रपानाच्या दृश्‍यांवर बंदी घातल्यामुळं धूम्रपानाच्या प्रमाणात निश्‍चितच घट होणार नाही. चित्रपटात धूम्रपानाची दृश्‍य दाखविणं बंद केल्यामुळं मी ही आता धूम्रपान करत नाही, असं सागणारा माणूस निश्‍चितच मिळणार नाही.

धूम्रपान आरोग्यास अपायकारक आहे, हे सगळ्यांनाच पटतं पण त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी डॉ. रामदास यांनी योजलेले उपाय निश्‍चितच चुकीचे आहेत. संपूर्ण देशासाठी किंवा सरसकट सर्वांसाठी एकच निर्णय घेऊन चालणार नाही. त्यापेक्षा देशात धूम्रपान करणाऱ्या नागरिकांचा काही अभ्यास करून तेथील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे भान ठेवून छोट्या छोट्या भागांसाठी निर्णयांची अंमलबजावणी केली तर त्याचा जास्त उपयोग होईल. धूम्रपान करणाऱ्या जवळपास 70 टक्के लोकांना त्याचे दुष्परिणाम माहिती असतातच, अशा वेळी परत ते दुष्परिणाम त्यांना सांगितल्यानं ते धूम्रपान करणं बंद करतील, असं वाटत नाही. केवळ प्रसिद्धी मिळवून देणारे निर्णय न घेता प्रश्‍नाच्या वर्मावर घाव घालणारे निर्णय घेतले पाहिजेत. डॉ. रामदास यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहता, ते किंवा त्याचं खातं असे निर्णय घेऊ शकतील, असं मुळीच वाटत नाही.

(ता.क. - धूम्रपान आरोग्यास अपायकारक आहे, हे मला पूर्णपणे पटतं. त्यामुळेच मी कधीही धूम्रपान करत नाही, याची नोंद घ्यावी.)

Saturday, August 18, 2007

लोकशाही आणि तीन स्तंभ


मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोट खटल्यात कणखरपणे सरकारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या ऍड. उज्ज्वल निकम यांचा पहिला नागरी सत्कार नुकताच पुण्यामध्ये झाला. पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास मठकरी यांच्या "कमलविकास' संस्थेनं या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होते. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ चाललेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील अनुभवांविषयी ऍड. निकम बोलणार असल्यामुळं पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात बालगंधर्व रंगमंदिरात गर्दी केली होती. काही दिवसांपूर्वीच या खटल्यातील एक आरोपी अभिनेता संजय दत्त याला शिक्षा भोगण्यासाठी येरवडा तुरुंगात आणण्यात आलं. त्यावेळी त्याच्या काही चाहत्यांनी तुरुंगाबाहेर गर्दी केली होती. येरवडा तुरुंगाबाहेर झालेली गर्दी आणि ऍड. निकम यांचे अनुभव ऐकण्यासाठी झालेली गर्दी यामध्ये एक मूलभूत फरक आहे. संजय दत्तचे चाहते त्याच्यावर असलेल्या आंधळ्या प्रेमानं त्याला पाठिंबा देण्यासाठी तुरुंगाबाहेर जमले होते तर "बालगंधर्व'मध्ये जमलेले नागरिक ऍड. निकम यांच्या कार्याला "सलाम' करण्यासाठी त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी तेथे आले होते.

ऍड. निकम यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्‌द्‌यांना स्पर्श केला. त्यापैकी काही त्यांनी स्पष्ट करून सांगितले तर काहींचा मात्र केवळ सूचक उल्लेख केला. कोणत्याही देशाची समाजव्यवस्था ही दोन महत्त्वाच्या गोष्टींवर टिकून असते. एक म्हणजे तिथल्या सामान्य नागरिकांचा तिथल्या चलनावर असलेला विश्‍वास आणि दोन म्हणजे तिथल्या न्यायव्यवस्थेवर असलेला विश्‍वास. ऍड. निकम यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख केला. सध्याची परिस्थिती अशी आहे की, सामान्य नागरिकांचा कायदेमंडळ आणि कार्यकारीमंडळावरचा विश्‍वास हळूहळू कमी कमी होत चालला आहे. अशावेळी त्याच्यासाठी केवळ एकच आशेचं स्थान आहे ते म्हणजे न्यायमंडळ. आधीच्या दोन्ही स्तंभांकडून आपली बाजू ऐकून घेतली गेली नाही तरी न्यायदेवतेकडून आपल्याला डावललं जाणार नाही, या विश्‍वासानं तो न्यायालयाचा दरवाजा ठोठावतो. न्यायालयांकडं येणाऱ्या खटल्याचं वाढतं प्रमाण आणि वाढत चाललेल्या जनहित याचिका हे याचेच चिन्ह आहे. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोन्हींसाठी ही धोक्‍याची सूचना देखील आहे. माझ्या मते, लोकशाहीच्या विकासासाठी सामान्य माणसांचा केवळ न्यायमंडळावर विश्‍वास असून चालणार नाही तर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे देखील आपल्या पर्यायानं देशाच्या भल्यासाठीच कार्यरत आहे. हे त्याला उमजलं पाहिजे, मगच त्याचा या दोन्हींवरील विश्‍वास वाढू शकेल.

देशातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी, गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी न्यायालयानं दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी वेगानं झाली पाहिजे, याकडंही ऍड. निकम यांनी लक्ष वेधलं. पुण्यातील राठी हत्यांकांडातील आरोपींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अजून अंमलबजावणी झालेली नाही. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा अजून अंमलात आलेली नाही. अशा परिस्थितीत बॉम्बस्फोट खटल्यातील 26 आरोपींना देण्यात आलेली फाशीची शिक्षाही कधी अंमलात येणार याबाबत प्रश्‍नचिन्हच आहे. राष्ट्रपतींकडं आलेल्या दयेच्या अर्जावर निर्णय देण्यासाठी काही कालमर्यादा ठरविण्यात आली पाहिजे, असं मत ऍड. निकम यांनी व्यक्त केलं. एका दृष्टीनं त्यांनी आपला त्रागाच व्यक्त केला. न्यायालयात आरोपींना शिक्षा होण्यासाठी, सबळ पुरावे जमविण्यासाठी, आवश्‍यक युक्तिवाद करण्यासाठी जिवाचा आटापिटा करायचा. एवढं सगळं करून एखाद्या आरोपींला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारी मंडळाला हलवत राहायचं. व्यवस्था कोलमडली असल्याचेच हे निदर्शक आहे. राष्ट्रपतींकडं आलेल्या दयेच्या अर्जावर ते स्वतःहून कोणताही निर्णय देत नाहीत. गृहमंत्रालय आणि संबंधितांकडून याबाबत मत मागविलं जातं. या मतावरूनच राष्ट्रपती आपला निर्णय देतात. त्यामुळं गृहमंत्रालय म्हणजेच कार्यकारी मंडळ याबाबत किती पुढाकार घेतं, यावरच सर्वकाही अवलंबून आहे.

लोकशाही व्यवस्थेचं कार्य हे शेवटी एका रथासारखं आहे. रथाचं एकजरी चाक निसटलं किंवा निकामी झालं तर बाकीच्यावर ताण येतो आणि हे सगळ तसंच पुढं रेटण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडण्याची शक्‍यता असते. केवळ न्यायमंडळानं आपलं कार्य पूर्ण क्षमतेनं करून चालणार नाही तर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळांनाही कचखाऊ भूमिका न घेता कठोरपणे आपलं कार्य करावं लागेल. लोकशाहीचे हे तिन्ही स्तंभ आपलं काम प्रामाणिकपणे करताहेत की नाही, हे पाहण्यासाठी चौथा स्तंभ म्हणजेच प्रसारमाध्यमं डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याचं काम करत आहेतच. पण त्यांचीही एक मर्यादा आहे. त्यामुळं प्रत्येकानाच शहाणपणानं वागलेलं बरं.

Friday, August 3, 2007

पुन्हा एकदा व्यक्तिपूजा


गुरुवारी रात्री साडेदहाची वेळ... पुण्यातील येरवडा तुरुंगाबाहेर अनेक तरुणतुर्कांची गर्दी... परिसरात राहणाऱ्या आणि आपल्या आवडत्या नायकाच्या दर्शनासाठी जमलेल्या असंख्य तरुण-तरुणींना रोखण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसलेली... काही वेळातच पोलिसांच्या गाड्यांचा ताफा येतो... त्यातीलच एका गाडीत न्यायालयानं गुन्हेगार ठरवलेला एक अभिनेता बसलेला असतो... काही वेळातच गाडीत बसलेला "तो' खाली उतरतो... तुरुंगाच्या छोट्या प्रवेशद्वारातून आत जाण्याआधी चाहत्यांना हात उंचावून अभिवादन करतो... हे सगळं "थेट' आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचविण्यासाठी अनेक कॅमेरे "लाईव्ह' असतात...

एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच हा प्रसंग. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी "मुन्नाभाई' संजय दत्तला विशेष "टाडा' न्यायालयानं सहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर सुरू झाली खरी स्टोरी! अगदी खच्चून "मसाला' भरलेल्या चित्रपटासारखीच. संजय दत्तनं आर्थर रोड तुरुंगात असताना जेवण केलं का नाही, त्यानं तिथं रात्र कशी काढली, तो कधी झोपला आणि कधी उठला, त्याला भेटण्यासाठी कोण कोण आलं, अशा अनेकविध प्रश्‍नांची उत्तरं वाचकांनी किंवा प्रेक्षकांनी मागितलेली नसताना सुद्धा काही माध्यमांनी ती देणं आपलं "कर्तव्य' आहे, असं समजत देऊन टाकली. माध्यमांनी बजावलेल्या "कर्तव्या'चा योग्य तो परिणाम झालाच. "मुन्नाभाई'च्या चाहत्यांनी आर्थर रोड आणि येरवडा तुरुंगाबाहेर केलेली गर्दी हा त्याचाच परिणाम.

राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेले "मुन्नाभाई एम.बी.बी.एस.' आणि "लगे रहो मुन्नाभाई' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले नसते तर मात्र संजय दत्तला आजच्या इतके चाहते नक्कीच लाभले नसते. माझ्या मते, संजूबाबाला हिरो बनविण्याच्या हेतूनेच "मुन्नाभाई एम.बी.बी.एस' प्रदर्शित करण्यात आला आणि तो साध्यही झाला. "लगे रहो मुन्नाभाई'चे कथानक मात्र वेगळं होतं. या चित्रपटामागं विचार होता. तंत्रज्ञानातील क्रांतीनं व्यापलेल्या सध्याच्या 21व्या शतकामध्येही महात्मा गांधीजींचे विचार उपयुक्त आहेत. हे सांगण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला. "मुन्नाभाई एम.बी.बी.एस.'मुळे संजय दत्त आणि अर्षद वारसी या दोघांभोवती निर्माण झालेलं वलय या चित्रपटामुळं अधिकच गडद झालं. प्रेक्षक सोयीस्करपणे चित्रपटातील विचार विसरून गेले. मात्र, लक्षात राहिला तो संजूबाबा. इथूनच त्याच्याविषयीच्या व्यक्तिपूजेला सुरूवात झाली. तशी व्यक्तिपूजा भारतीयांना नवी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो किंवा महात्मा ज्योतिबा फुले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असो किंवा आणखी कुणी. आम्हाला त्या व्यक्तिच्या विचारांशी काही देणं घेणं नाही. आम्ही मानतो ते फक्त त्या व्यक्तिला. मग त्यांची जयंती असो किंवा पुण्यतिथी. एका मंडपात "त्या' व्यक्तिचा फोटो ठेवून वरून हार घालायचा. संध्याकाळी भलीमोठाली मिरवणूक काढायची आणि पुन्हा वर्षभर तो फोटो कुठंतरी अडगळीत ठेवून द्यायचा. झाला आमचा कार्यभाग संपला. संजय दत्तला पाहण्यासाठी जमलेले चाहते, याच व्यक्तिपूजेच्या आहारी गेलेले. संजय दत्तला शिक्षा सुनावताना न्यायालयानं त्याच्यावर ओढलेले ताशेरे सोयीस्करपणे विसरले जातात. संजय दत्तनं केवळ स्वतः गुन्हा केलेला नसून, इतरांनाही गुन्हा करण्यास प्रवृत्त केलंय. पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केलाय, हे सगळं कोण बघतंय. आम्हाला आपला संजूबाबाच प्रिय.

या सगळ्याला प्रसिद्धी देताना आपण इतरांपेक्षा वेगळं काय देऊ शकतो, हे सतत पाहणारी माध्यमं आपण नक्की काय देत आहोत, याकडं मात्र कानाडोळा करतात. प्रत्येक घटना "लाईव्ह' करण्याची खरंच गरज आहे का? अशा घटना "लाईव्ह' करण्यापेक्षा समाजात इतरही बरंच काही घडत आहे. ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याची गरज आहे. हे कधी लक्षात घेणार. प्रत्येक बातमीमध्ये काहीतरी "मसाला' असलाच पाहिजे का? या सगळ्याचा विचार करण्याची हीच खरी वेळ आहे. आपल्याकडं चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्या ही सध्याच्या स्थितीत खूप प्रभावी माध्यमं आहेत. तुम्ही या माध्यमातून जे काही द्याल ते शेवटच्या माणसापर्यंत झिरपत. प्रेक्षकांना पर्यायानं जनतेला प्रभावित करण्याचं कामही हे माध्यम करू शकतं. फक्त तुम्ही प्रेक्षकांपर्यंत जे पोचवत आहात त्याच आकलन त्यांना योग्य पद्धतीनं होईल, याची काळजी घेण्याची गरज आहे.

न्यायालयाच्या लेखी संजय दत्त गुन्हेगार आहे. भारतीय कायद्याप्रमाणे त्याला शिक्षाही झाली आहे. आता ही शिक्षा तो येरवड्यातील तुरुंगात भोगेल किंवा आणखी कुठल्या तुरुंगात, तो फक्त सुरक्षेचा आणि प्रशासकीय भाग आहे. शिक्षा संपेपर्यंत तरी इतर कैद्यांप्रमाणे संजय दत्तही एक कैदी आहे. इतरांप्रमाणे त्यालाही तुरुंगात काम करावं लागेल. या सगळ्याच्या विरोधात त्याचे वकील यथायोग्य न्यायालयीन लढाई लढतीलच. फक्त आपण एक नागरिक म्हणून यामध्ये कितपत वाहत जायच, ते आपल्यालाच ठरवायला लागेल. संजय दत्तला लाखो चाहते आहेत म्हणून भारतातील काय जगातील कोणतंही न्यायालय त्याला माफ करणार नाही, हे लक्षात ठेवलेलं बरं, नाहीतर पुढं आपणच वेड्यात निघू आणि त्याला जबाबदारही आपणच असू.

Saturday, July 28, 2007

ब्रॉडशीट ते ब्लॉग



प्रवास... हा सर्वव्यापी, सर्वस्पर्शी शब्द. जन्मापासून मृत्यूपर्यंत, उमलण्यापासून कोमेजण्यापर्यंत निसर्गातील प्रत्येक घटकाचा प्रवास सुरू असतो. प्रवासात वेगवेगळे टप्पे येतात. काही वेळेला बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये तर काही वेळेला आव्हान स्वीकारून परिस्थितीमध्येही बदल करावा लागतो. या सर्व प्रक्रियेमध्ये नकळतपणे आपण स्वतःही काही शिकत असतो. व्यवहारी भाषेत त्यालाच 'अनुभव' म्हणतात. ब्रॉडशीट ते ब्लॉग हा असाच एक प्रवास.

ब्रॉडशीट हा शब्द मुद्रित किंवा छापील माध्यमाचे प्रतिनिधित्व करतो तर ब्लॉग हा तंत्रज्ञांनाधारित डिजिटल माध्यमाचा निदर्शक. ब्रॉडशीटपासून सुरू झालेला माध्यमांचा प्रवास आता ब्लॉगपर्यंत येऊन पोचला आहे. दरम्यानच्या काळात चॅनलनही आपलं बस्तान बसवलं आहेच. तसं बघायला गेलं तर ब्लॉग हा या प्रवासातील अंतिम टप्पा नाही. पण सध्यातरी हा प्रवास या टप्प्याभोवती रेंगाळला आहे. ब्रॉडशीट हे माध्यम अजून तरी आपल्याकडं प्रभावी आहेच. पण त्यालाही आता नवनवीन माध्यमांच्या सोबत आपला पुढचा प्रवास सुकर करावा लागणार, यात तिळमात्र शंका नाही.

माध्यम तुमच्या हातात

"मला काहीतरी सांगायचंय' हे वाक्‍य माध्यमनिर्मितीच्या आणि त्यांच्या विकासाच्या केंद्रस्थानी आहे. माझ्याकडं किंवा आमच्याकडं काहीतरी माहिती आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोचविणं गरजेचं आहे, हा केंद्रबिंदू ठेवूनच वृत्तपत्रांचा विकास होत गेला. गेल्या काही वर्षांपर्यंत तुम्हाला काही तरी सांगायचं असेल तर ते वृत्तपत्र, चॅनल चालविणाऱ्या संस्था, कंपन्यापर्यंत घेऊन जायला लागत होतं. तुमच्याकडे असलेली माहिती "बातमी' किंवा "लेख' या सदरात मोडणारी असली तरच ती त्यांच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोचू शकत होती. ब्लॉगमुळं मात्र, माझ्याकडं काहीतरी वेगळी माहिती आहे, मी काहीतरी वेगळा विचार केला आहे आणि मोठ्या प्रमाणावर तो मला कुणाला तरी सांगायचा आहे, यासाठी वृत्तपत्र किंवा चॅनल चालविणाऱ्या संस्थांवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही. म्हणजेच एकप्रकारे माध्यमच तुमच्या हातात आलं आहे. आता या माध्यमाचा कसा वापर करायचा, हे तुम्हालाच ठरवायचं आहे किंबहुना आपण असंही म्हणू शकतो की, ब्लॉगचा तुम्ही कसा वापर करता यावरच या माध्यमाचं भवितव्य अवलंबून आहे.

वृत्तपत्र आणि चॅनल दोन्हींची ताकद

लेखी शब्द ही वृत्तपत्रांची तर व्हिज्युअल्स ही चॅनलची ताकद. वृत्तपत्रांपेक्षा चॅनलचा वेग आणि पोहोच जास्त, हे सुद्धा निर्विवाद सत्य. पण चॅनलच्या वाढत्यासंख्येमुळे भारताततरी वृत्तपत्रांच्या खपावर फार मोठा परिणाम झालेला दिसत नाही. उलट चॅनलच्या वाढत्याप्रसारामुळे वृत्तपत्रांमधील छायाचित्रांची संख्या आणि आकार निश्‍चित वाढला. आता ब्लॉग किंवा इटरनेट या तिसऱ्या माध्यमामध्ये वरील दोन्ही माध्यमांच्या एकत्रिकरणाची शक्ती आहे. तुम्हाला वाचण्याची आणि पाहण्याची किंवा ऐकण्याची सुविधा या माध्यमातून मिळते. त्यामुळे हे माध्यम वरील दोन्हींपेक्षा प्रभावी ठरणार, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बरं दुसरी गोष्ट अशी की, ब्लॉग किंवा इंटरनेटचा विचार केला तर त्याची पोहोच ही वृत्तपत्र आणि चॅनल या दोन्हींपेक्षा जास्त. सातासमुद्रापार असलेल्या कोणत्याही देशातील कोणत्याही गावात, हव्या त्या वेळी तुम्ही तुम्हाला हवं ते वाचू शकता, हवं ते ऐकू शकता आणि हवं ते पाहू शकता. निवडीचे स्वातंत्र्य तुमच्याच हातात. तुम्हाला हवी ती वेबसाईट उघडा किंवा हवा तो ब्लॉग. आवडलं तर वाचा नाहीतर सोडून द्या. हे सगळं अगदी एका शब्दात सांगायचं झालं तर हे माध्यम अधिक "पर्सनलाईझ' आहे.

इंटरऍक्‍टिव्हिटी

इंटरनेट आणि इंटरऍक्‍टिव्हिटी या दोन्ही शब्दांमध्ये एकसमान धागा आहे. इंटरऍक्‍टिव्हिटी हा इंटरनेटचा प्राण आहे आणि इंटरनेट हा इंटरऍक्‍टिव्हिटीसाठी एंट्रीपॉईंट. "मी सांगतो तुम्ही ऐका' किंवा "मी लिहितो तुम्ही वाचा' याकडून आता "मी विचार मांडतो तुम्ही त्यात तुमच्या विचारांची भर घाला' याकडे प्रवास सुरू झाला आहे. हा प्रवास सुरू होण्यामधील महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंटरनेट. तुम्ही म्हणाल इंटरनेट येण्याआधी इंटरऍक्‍टिव्हिटी नव्हती का? माझ्यामते होती. पण इतकी प्रभावी नव्हती जितकी इंटरनेटमुळं झाली आहे. आतापर्यंत आपल्यापुढं येणाऱ्या माहितीतून आपण स्वतः काहीतरी विचार करत होतोच. घरातल्यांबरोबर, नातेवाईंकाबरोबर, मित्रांबरोबर, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांबरोबर त्यावर चर्चाही करत होतो. काहीजण त्यापुढे जाऊन माध्यमाच्या प्रतिनिधीकडं आपलं मत नोंदवित होते. इंटरनेटमुळं तुम्ही एखादी माहिती वाचल्याक्षणी तुमचं मत नोंदवू शकता. पुढच्या सेंकदाला तुमचं मत दुसरा कोणीतरी वाचू शकतो. लगचेच तिसरा कोणीतरी तुमच्या मतामध्ये किंवा माहितीमध्ये दुरुस्ती करू शकतो. असं हे चक्र दिवस-रात्र अव्याहतपणे चालू राहतं. तुम्हाला मत देण्यापलिकडे काहीतरी सांगायचं असेल तर ब्लॉग आहेच ना.
"शेअरिंग' ही या माध्यमाची आणखी एक ताकद. "मी काहीतरी चांगल पाहिलं आहे तुम्ही पण पाहा.' असं म्हणत तुम्ही एखादी गोष्ट शेअर करू शकता. तुमचा अनुभव, तुमचं यश, तुमचे निर्णय अगदी सगळं काही तुम्ही इतरांसोबत शेअर करू शकता. बरं शेअर करणाऱ्यांसाठीचा परिघही बराच व्यापक आहे. त्यातून तुम्ही तुमचं "नेटवर्क'ही उभारू शकता.

या सगळ्यातून पुढं काय होईल?

एक चांगलं वाक्‍य नुकतंच वाचनात आलं "In political life, an organised minority is always stronger than disorganised majority and organising is easier on the internet.' माझ्यामते, या वाक्‍याचा शेवट अतिशय महत्त्वाचा आहे. समानविचाराधारेच्या लोकांना एकत्रित करण्याचं, संघटित करण्याचं कार्य इंटरनेटमुळं सहज शक्‍य होऊ शकतं. ऑर्कुटवरील कम्युनिटीज हा त्याचाच एक अविष्कार. पाश्‍चिमात्य देशातील नागरिकांनी या माध्यमाला आपलंस करून टाकलं आहे. आपल्याकडंही हळूहळू का होईना, त्याचा प्रसार वाढतो आहे.
राजकीय पक्ष 2009मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत काही प्रमाणात आणि 2014 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मोठ्याप्रमाणात इंटरनेटचा आपल्या प्रचारासाठी वापर करतील. त्याचवेळी कोणत्याही पक्षाशी संबंधित नसणारे पण कोणत्या पक्षाचे सरकार आल्यास देशाचं भलं होईल, असा विचार करणारे किंवा मागील सरकारच्या यशापयशाचा पाढा वाचणारे आपापल्या ब्लॉगच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या प्रचाराला पूरक किंवा मारक अशी भूमिका बजावतील. हळूहळू हे सगळं विधिमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही झिरपत जाईल. केवळ मतदान करण्यापलिकडं आपली काहीतरी भूमिका असली पाहिजे आणि ती आपण इतरांपर्यंत पोचविली पाहिजे, याबद्दल समाजात जागृती होईल, असं मला वाटतं.
सर्व प्रकारच्या माध्यमांचे स्वरूप एकतर्फी संवादाचे न राहता दुतर्फी संवादाला चालना मिळेल. माझ्याकडे काही माहिती आहे. तुम्ही त्यामध्ये तुमच्या माहितीची, अनुभवांची भर घाला, असं काहीसं स्वरूप या संपूर्ण प्रक्रियेला येईल. माहितीचे आदान-प्रदान, त्याबद्दल व्यक्त झालेली मतं, मूळ माहितीमध्ये नव्याने पडलेली भर, सुधारित माहितीचे पुन्हा आदान-प्रदान असं हे चक्र सुरू राहील. एकूणच मूळ माहिती ही सतत अपडेट होत राहील.
ही प्रक्रिया घडत असताना व्यक्तिव्यक्तिंमधील संबंध, संपर्क तांत्रिक झाल्याने मनुष्य एकलकोंडा होण्याची शक्‍यताही आहे. दोन व्यक्तिंमधील प्रत्यक्ष संपर्क कमी झाला आणि केवळ तांत्रिक माध्यमातून संपर्क प्रस्थापित होऊ लागला तर त्याचा आवश्‍यक एकत्रित परिणाम साधला जाऊ न शकण्याची भीती आहेच.
माहिती फार वेगाने आपल्यापुढे येऊन आदळणार असल्यानं त्यातील काय लक्षात ठेवायचं आणि कोणत्या गोष्टीकडं कटाक्षानं दुर्लक्ष करायचं, याबद्दल आपली मतं तयार करून ठेवावी लागतील. आपल्यापुढे आलेल्या माहितीपैकी काय खरं आणि काय खोटं हे जोखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर "स्कॅनिंग' करणं गरजेचं होणार आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळं आपापल्या क्षेत्रात स्वतःला "अप-टू-डेट' ठेवणं ओघानं आलंच.

ब्रॉडशीट ते ब्लॉग या प्रवासात ब्लॉग किंवा इंटरनेटने घेतलेल्या भन्नाट एंट्रीविषयी सांगण्याचा हा एक प्रयत्न. मी अगोदर म्हटल्याप्रमाणं ब्लॉग किंवा इंटरनेट हे माध्यम आधीच्या दोन्हींपेक्षा प्रभावी आहे. पण त्याचे भवितव्य आपण त्याचा वापर कसा करतो, यावर अवलंबून आहे. शेवटी इतकेच सांगतो.

पेला अर्धा सरला आहे,
असं देखील म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे,
असं देखील म्हणता येतं
मग सरला आहे म्हणायचं,
की भरला आहे म्हणायचं,
तुम्हीच ठरवायचं.

(टीप - एवढं सगळ वाचल्यावर तुम्हाला निश्‍चितपणे माझ्या माहितीमध्ये काहीतरी भर घालावी, असं वाटल असणार. अहो मग वाट कसली पाहता? पाठवा तुमचे विचार आणि माहिती "कमेंट'च्या माध्यमातून माझ्यापर्यंत. हीच तर या माध्यमाची ताकद आहे.)

Friday, July 27, 2007

मुंबई मेरी जान...




मुंबईविषयी महाराष्ट्राप्रमाणेच संपूर्ण भारतातील लोकांना एक प्रकारचे कुतूहल आहे. मुंबईतील माणसे, सतत धावणाऱ्या लोकल्स, मोठमोठाले सिमेंटचे रस्ते, "बेस्ट' आणि इथली चंदेरी दुनिया या सर्वांविषयी लहानपणापासूनच इतरांप्रमाणे मलाही उत्सुकता होती. मोठं झाल्यावर कधीतर मुंबईत जाऊन राहायचं, अशी माझी इच्छा. योगायोगाने नोकरीच्या निमित्ताने ती पूर्णही झाली. नोकरीसाठी साधारणपणे दीडेक वर्ष मी मुंबईत काढली. मुंबईने मला काय दिले? असा प्रश्‍न कधी स्वतःला विचारला तर वेगाने जीवन जगण्याची, छोट्या छोट्या गोष्टींसाठी कुरकुरत न बसण्याची, अडजेस्टमेंट करण्याची सवय मला मुंबईने दिली. दमट हवामान सोडले तर मुंबई इतके दुसरे सुंदर शहर नाही, असे माझं मत आहे.

लहानपणापासून सर्व आयुष्य पुण्यातच गेल्याने नोकरीसाठी का होईना पुणं सोडून जावे, असे वाटत नव्हते. त्यातून "आपलं घर बरं आणि आपली माणसं बरी' ही टिपिकल मराठी वृत्ती इतरांप्रमाणे माझ्यातही भिनलेली. पण मुंबईत जायला मिळतंय म्हटल्यावर संधी हातची घालवायची नाही या विचाराने मी 2004 मध्ये मुंबईला गेलोच. मित्रांमुळे नवी मुंबईत राहण्याची सोयही झाली आणि इतर मुंबईकरांप्रमाणेच माझाही नेरुळ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) असा रोजचा प्रवास सुरू झाला.

मुंबईची जडणघडण इतर शहरांपेक्षा फार वेगळ्या पद्धतीने झाली आहे. मुळ मुंबईकरांपेक्षा नोकरी-धंद्याच्या निमित्ताने इथं आलेल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आपण मुळ मुंबईकर नाही, ही भावना इथे राहणाऱ्या जास्तीत जास्त लोकांमध्ये असल्यामुळे कुठेही अडजेस्टमेंट करण्यास बहुसंख्य मुंबईकर कधीही तयार असतात. लोकलमध्ये तीन सीटच्या बाकड्यावर चार माणसे अगदी गुण्यागोविदांन बसतात. डब्यात एखादी महिला उभी असल्यास सीटवर बसलेला वयस्कर माणूसही स्वतः उभा राहून तिला बसण्यास जागा देतो. हे चित्र मी स्वतः इतक्‍यावेळेला पाहिले की पुढे पुढे तर मी ही स्वतः उभा राहून वयस्कर प्रवाशांना जागा देऊ लागलो. या सर्वांत "हॅटस ऑफ' करायचा तो इथल्या महिलांना. घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून रोज 40-40 किलोमीटरचा प्रवास लोकलच्या गच्च भरलेल्या डब्यातून करणं सोपं नाही. फलाटावर येणाऱ्या लोकलगाड्या थांबायच्या आतच त्यामध्ये चढण्याची कामगिरी अनेक महिला रोज करतात. बरं हे सर्व करतानाच सकाळी गाडीत बसल्यावर महालक्ष्मी स्तोत्र, अथर्वशीर्ष म्हणायचे आणि संध्याकाळी घरी आल्यावर भाजी निवडण्यात वेळ जायला नको, म्हणून लोकलमध्येच मैत्रिणीशी गप्पा मारत-मारत ते ही काम उरकायचे. कसं काय जमतं हे सगळं त्यांना याचे मला कायम आश्‍चर्य वाटायचं. हे सर्व पाहिले असल्याने पुण्यात किंवा इतर कोणत्याही शहरांत छोट्या छोट्या गोष्टींसाठी सतत रडणाऱ्या माणसांचा मला रागच येऊ लागला.


दक्षिण मुंबईतील गिरगाव, काळबादेवी, कुलाबा, ग्रॅंट रोड हा एक वेगळाच अनुभव. एकतर आपल्याला दक्षिण मुंबईत राहायला मिळाले, याचा इथं राहणाऱ्या सर्वांना खूप मोठा अभिमान. कारण एकच की सर्व ऑफिसेस इथून अगदी चालत किंवा बसने जाण्याच्या अंतरावर. माझा एक मित्र गिरगावात राहत असल्यामुळे इथला भाग मला अगदी जवळून पाहता आला. पूर्वी म्हणे गिरगावात मराठी माणसांचे प्राबल्य होते पण कुटुंब वाढले आणि उत्पन्न तेवढेच राहिल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे बहुतेकांनी इथली घरे विकून डोंबिवली किंवा इतर उपनगरांत जाण्याचा निर्णय घेतला. काहींनी मालकाकडून मिळेल ते पैसे पदरात पाडून घेत आपली भाड्याची घरे सोडली आणि इतर ठिकाणी संसार मांडला. हे सर्व घडत असतानाच गुजराथी नागरिकांनी गिरगावात मोठ्याप्रमाणावर जागा खरेदी केल्या. आता काहींच्या मते गिरगावात मराठी माणूस एक टक्काही उरला नाही तर काही गिरगावकर अजून या भागात आमचेच वर्चस्व असल्याचे सांगतात.आठवड्यातील सोमवार ते शनिवार दक्षिण मुंबईही इतर भागांप्रमाणेच फक्त धावते. इथला रविवार मात्र अगदीच वेगळा असतो. फोर्टसारख्या भागात आणीबाणी जाहीर केल्याप्रमाणे रस्त्यांवर शुकशुकाट असतो तर गिरगावातल्या प्रसिद्धी पावलेल्या हॉटेलांबाहेर जेवणासाठी रांगा लागतात. रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांऐवजी क्रिकेट खेळणारी मुले, थ्री-फोर्थ पॅंट आणि वर टी-शर्ट चढवून सकाळपासून संध्याकाळपर्यंत गल्लोगल्ली फिरणारे युवक असा सगळा वेगळाच माहोल यादिवशी तुम्हाला दिसेल. हा सगळाच बदल खूपच आश्‍चर्यचकित करणारा असतो. पुन्हा सोमवार उजाडला की सारे काही नित्यनेमानं सुरू होतं. दादर, वांद्रे सारख्या भागात रविवारी खरेदीसाठी अगदी पुण्यातील तुळशीबागेप्रमाणेच गर्दी असते. मुंबईतील एक वैशिष्ट्य म्हणजे लोकलगाड्या या शहराच्या रक्तवाहिन्या असल्यामुळे जिथंजिथं स्टेशन आहे. तिथंतिथं तुम्हाला हवी तो गोष्ट अगदी सहजपणे मिळू शकते. जशी नदीच्या किनाऱ्यावर गावं वसलेली असतात तसं मुंबई हे मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या रुळांच्या किनाऱ्यावरून वाढत गेलंय, असं म्हटले तरी वावगं ठरू नये.


मुंबईतील "बेस्ट'ची सेवा खरोखरंच बेस्ट आहे. स्वच्छ धुतलेल्या बसेस, कंडक्‍टरकडे सुट्या पैशांचा कधीही नसलेला तुटवडा, बसेसची पर्याप्त "फ्रिक्वेन्सी' यामुळे "बेस्ट'ची सेवा कायम लक्षात राहते. ज्याला मुंबईतल्या रस्त्यांची माहिती करून घ्यायची आहे, त्याने फक्त "बेस्ट'मधूनच प्रवास करावा. यालाच उलट आपण असेही म्हणू शकतो की ज्याला "बेस्ट'चे मार्ग कळले त्याला मुंबई कळली. पुण्यातल्या पीएमटीने प्रवास केलेल्या मला तरी बेस्टची सर्व्हिस जास्त लोकोपयोगी वाटते.


मुंबईत खवय्यांची चांगलीच चंगळ होते. इथे महाराष्ट्रीयन, साउथ इंडियन, पंजाबी, गुजराथी, कॉंटिनेंटल, चायनीज, फास्ट फूड असे सर्व प्रकारातील पदार्थ अगदी सहज मिळू शकतात. त्यातही काही हॉटेल्स ही विशिष्ट प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत. गुजराथी पदार्थ खायचे असतील तर मुंबादेवी जवळच्या "सुरती'मध्ये जा. अस्सल पंजाबी पदार्थांसाठी याच भागात असलेल्या "भगत ताराचंद'ला पर्याय नाही. माटुंगा स्टेशनाच्या जवळच असलेल्या "शारदा'मध्ये तुम्हाला अप्रतिम साउथ इंडियन डिशेस मिळतील. "मणीज'मधील साउथ इंडियन थाळी तर लाजवाब. याशिवाय "सीएसटी' स्टेशनच्या बाहेर मिळणारी "शर्मा'ची मिसळ, 'आराम'चा वडापाव आणि मसाला चहा, फोर्ट भागात सोमवार ते शनिवार मिळणारी बटाट्याची भजी आणि पाव त्याबरोबरच वडापाव हे पदार्थ एकदा का होईना "टेस्ट' केलेच पाहिजेत. गिरगावातल्या "विनय हेल्थ होम'ची मिसळ आणि वांगीपोहे खाल्ले नाही तर तुम्ही मुंबई पाहिलीच नाही, असे म्हटता येईल.


मुंबई खरोखरच एक चमत्कारिक रसायन आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये झालेले बॉम्बस्फोट असो किंवा घाटकोपरमध्ये "बेस्ट'च्या बसमध्ये झालेला स्फोट असो. झालेल्या गोष्टीबद्दल रडत न बसता त्यातून मार्ग काढणे, आता पुढे काय होईल यामुळे घाबरून घरी न बसता चालत राहणे, ही मुंबईकरांची जिगर मला आणि माझ्यासारख्या अनेकांना बरंच काही शिकवून जाते. तुमच्याकडे काय नाही याचा विचार न करता जे काही आहे, त्यातून तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी काय करू शकता, हे शिकायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील काही वर्षे मुंबईत काढली पाहिजेत. एका ब्लॉगमध्ये संपूर्ण मुंबईचे वैशिष्ट्य सांगणे शक्‍य नाही आणि संपूर्ण मुंबई मला कळली आहे, असे माझे मतही नाही. मी जे काही अनुभवले ते सांगण्याच हा एक प्रयत्न. बाकी Mumbai is really Great!