Friday, July 27, 2007

मुंबई मेरी जान...




मुंबईविषयी महाराष्ट्राप्रमाणेच संपूर्ण भारतातील लोकांना एक प्रकारचे कुतूहल आहे. मुंबईतील माणसे, सतत धावणाऱ्या लोकल्स, मोठमोठाले सिमेंटचे रस्ते, "बेस्ट' आणि इथली चंदेरी दुनिया या सर्वांविषयी लहानपणापासूनच इतरांप्रमाणे मलाही उत्सुकता होती. मोठं झाल्यावर कधीतर मुंबईत जाऊन राहायचं, अशी माझी इच्छा. योगायोगाने नोकरीच्या निमित्ताने ती पूर्णही झाली. नोकरीसाठी साधारणपणे दीडेक वर्ष मी मुंबईत काढली. मुंबईने मला काय दिले? असा प्रश्‍न कधी स्वतःला विचारला तर वेगाने जीवन जगण्याची, छोट्या छोट्या गोष्टींसाठी कुरकुरत न बसण्याची, अडजेस्टमेंट करण्याची सवय मला मुंबईने दिली. दमट हवामान सोडले तर मुंबई इतके दुसरे सुंदर शहर नाही, असे माझं मत आहे.

लहानपणापासून सर्व आयुष्य पुण्यातच गेल्याने नोकरीसाठी का होईना पुणं सोडून जावे, असे वाटत नव्हते. त्यातून "आपलं घर बरं आणि आपली माणसं बरी' ही टिपिकल मराठी वृत्ती इतरांप्रमाणे माझ्यातही भिनलेली. पण मुंबईत जायला मिळतंय म्हटल्यावर संधी हातची घालवायची नाही या विचाराने मी 2004 मध्ये मुंबईला गेलोच. मित्रांमुळे नवी मुंबईत राहण्याची सोयही झाली आणि इतर मुंबईकरांप्रमाणेच माझाही नेरुळ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) असा रोजचा प्रवास सुरू झाला.

मुंबईची जडणघडण इतर शहरांपेक्षा फार वेगळ्या पद्धतीने झाली आहे. मुळ मुंबईकरांपेक्षा नोकरी-धंद्याच्या निमित्ताने इथं आलेल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आपण मुळ मुंबईकर नाही, ही भावना इथे राहणाऱ्या जास्तीत जास्त लोकांमध्ये असल्यामुळे कुठेही अडजेस्टमेंट करण्यास बहुसंख्य मुंबईकर कधीही तयार असतात. लोकलमध्ये तीन सीटच्या बाकड्यावर चार माणसे अगदी गुण्यागोविदांन बसतात. डब्यात एखादी महिला उभी असल्यास सीटवर बसलेला वयस्कर माणूसही स्वतः उभा राहून तिला बसण्यास जागा देतो. हे चित्र मी स्वतः इतक्‍यावेळेला पाहिले की पुढे पुढे तर मी ही स्वतः उभा राहून वयस्कर प्रवाशांना जागा देऊ लागलो. या सर्वांत "हॅटस ऑफ' करायचा तो इथल्या महिलांना. घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून रोज 40-40 किलोमीटरचा प्रवास लोकलच्या गच्च भरलेल्या डब्यातून करणं सोपं नाही. फलाटावर येणाऱ्या लोकलगाड्या थांबायच्या आतच त्यामध्ये चढण्याची कामगिरी अनेक महिला रोज करतात. बरं हे सर्व करतानाच सकाळी गाडीत बसल्यावर महालक्ष्मी स्तोत्र, अथर्वशीर्ष म्हणायचे आणि संध्याकाळी घरी आल्यावर भाजी निवडण्यात वेळ जायला नको, म्हणून लोकलमध्येच मैत्रिणीशी गप्पा मारत-मारत ते ही काम उरकायचे. कसं काय जमतं हे सगळं त्यांना याचे मला कायम आश्‍चर्य वाटायचं. हे सर्व पाहिले असल्याने पुण्यात किंवा इतर कोणत्याही शहरांत छोट्या छोट्या गोष्टींसाठी सतत रडणाऱ्या माणसांचा मला रागच येऊ लागला.


दक्षिण मुंबईतील गिरगाव, काळबादेवी, कुलाबा, ग्रॅंट रोड हा एक वेगळाच अनुभव. एकतर आपल्याला दक्षिण मुंबईत राहायला मिळाले, याचा इथं राहणाऱ्या सर्वांना खूप मोठा अभिमान. कारण एकच की सर्व ऑफिसेस इथून अगदी चालत किंवा बसने जाण्याच्या अंतरावर. माझा एक मित्र गिरगावात राहत असल्यामुळे इथला भाग मला अगदी जवळून पाहता आला. पूर्वी म्हणे गिरगावात मराठी माणसांचे प्राबल्य होते पण कुटुंब वाढले आणि उत्पन्न तेवढेच राहिल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे बहुतेकांनी इथली घरे विकून डोंबिवली किंवा इतर उपनगरांत जाण्याचा निर्णय घेतला. काहींनी मालकाकडून मिळेल ते पैसे पदरात पाडून घेत आपली भाड्याची घरे सोडली आणि इतर ठिकाणी संसार मांडला. हे सर्व घडत असतानाच गुजराथी नागरिकांनी गिरगावात मोठ्याप्रमाणावर जागा खरेदी केल्या. आता काहींच्या मते गिरगावात मराठी माणूस एक टक्काही उरला नाही तर काही गिरगावकर अजून या भागात आमचेच वर्चस्व असल्याचे सांगतात.आठवड्यातील सोमवार ते शनिवार दक्षिण मुंबईही इतर भागांप्रमाणेच फक्त धावते. इथला रविवार मात्र अगदीच वेगळा असतो. फोर्टसारख्या भागात आणीबाणी जाहीर केल्याप्रमाणे रस्त्यांवर शुकशुकाट असतो तर गिरगावातल्या प्रसिद्धी पावलेल्या हॉटेलांबाहेर जेवणासाठी रांगा लागतात. रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांऐवजी क्रिकेट खेळणारी मुले, थ्री-फोर्थ पॅंट आणि वर टी-शर्ट चढवून सकाळपासून संध्याकाळपर्यंत गल्लोगल्ली फिरणारे युवक असा सगळा वेगळाच माहोल यादिवशी तुम्हाला दिसेल. हा सगळाच बदल खूपच आश्‍चर्यचकित करणारा असतो. पुन्हा सोमवार उजाडला की सारे काही नित्यनेमानं सुरू होतं. दादर, वांद्रे सारख्या भागात रविवारी खरेदीसाठी अगदी पुण्यातील तुळशीबागेप्रमाणेच गर्दी असते. मुंबईतील एक वैशिष्ट्य म्हणजे लोकलगाड्या या शहराच्या रक्तवाहिन्या असल्यामुळे जिथंजिथं स्टेशन आहे. तिथंतिथं तुम्हाला हवी तो गोष्ट अगदी सहजपणे मिळू शकते. जशी नदीच्या किनाऱ्यावर गावं वसलेली असतात तसं मुंबई हे मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या रुळांच्या किनाऱ्यावरून वाढत गेलंय, असं म्हटले तरी वावगं ठरू नये.


मुंबईतील "बेस्ट'ची सेवा खरोखरंच बेस्ट आहे. स्वच्छ धुतलेल्या बसेस, कंडक्‍टरकडे सुट्या पैशांचा कधीही नसलेला तुटवडा, बसेसची पर्याप्त "फ्रिक्वेन्सी' यामुळे "बेस्ट'ची सेवा कायम लक्षात राहते. ज्याला मुंबईतल्या रस्त्यांची माहिती करून घ्यायची आहे, त्याने फक्त "बेस्ट'मधूनच प्रवास करावा. यालाच उलट आपण असेही म्हणू शकतो की ज्याला "बेस्ट'चे मार्ग कळले त्याला मुंबई कळली. पुण्यातल्या पीएमटीने प्रवास केलेल्या मला तरी बेस्टची सर्व्हिस जास्त लोकोपयोगी वाटते.


मुंबईत खवय्यांची चांगलीच चंगळ होते. इथे महाराष्ट्रीयन, साउथ इंडियन, पंजाबी, गुजराथी, कॉंटिनेंटल, चायनीज, फास्ट फूड असे सर्व प्रकारातील पदार्थ अगदी सहज मिळू शकतात. त्यातही काही हॉटेल्स ही विशिष्ट प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत. गुजराथी पदार्थ खायचे असतील तर मुंबादेवी जवळच्या "सुरती'मध्ये जा. अस्सल पंजाबी पदार्थांसाठी याच भागात असलेल्या "भगत ताराचंद'ला पर्याय नाही. माटुंगा स्टेशनाच्या जवळच असलेल्या "शारदा'मध्ये तुम्हाला अप्रतिम साउथ इंडियन डिशेस मिळतील. "मणीज'मधील साउथ इंडियन थाळी तर लाजवाब. याशिवाय "सीएसटी' स्टेशनच्या बाहेर मिळणारी "शर्मा'ची मिसळ, 'आराम'चा वडापाव आणि मसाला चहा, फोर्ट भागात सोमवार ते शनिवार मिळणारी बटाट्याची भजी आणि पाव त्याबरोबरच वडापाव हे पदार्थ एकदा का होईना "टेस्ट' केलेच पाहिजेत. गिरगावातल्या "विनय हेल्थ होम'ची मिसळ आणि वांगीपोहे खाल्ले नाही तर तुम्ही मुंबई पाहिलीच नाही, असे म्हटता येईल.


मुंबई खरोखरच एक चमत्कारिक रसायन आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये झालेले बॉम्बस्फोट असो किंवा घाटकोपरमध्ये "बेस्ट'च्या बसमध्ये झालेला स्फोट असो. झालेल्या गोष्टीबद्दल रडत न बसता त्यातून मार्ग काढणे, आता पुढे काय होईल यामुळे घाबरून घरी न बसता चालत राहणे, ही मुंबईकरांची जिगर मला आणि माझ्यासारख्या अनेकांना बरंच काही शिकवून जाते. तुमच्याकडे काय नाही याचा विचार न करता जे काही आहे, त्यातून तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी काय करू शकता, हे शिकायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील काही वर्षे मुंबईत काढली पाहिजेत. एका ब्लॉगमध्ये संपूर्ण मुंबईचे वैशिष्ट्य सांगणे शक्‍य नाही आणि संपूर्ण मुंबई मला कळली आहे, असे माझे मतही नाही. मी जे काही अनुभवले ते सांगण्याच हा एक प्रयत्न. बाकी Mumbai is really Great!


4 comments:

ashishchandorkar said...

Kharach Mumbai Great ahe... Good Writing style and information also. Keep Writing. Always keep message of Santa Ramdas in mind that DISAMAJI KAHI LIHIT JAVE....

Ashish

प्राची said...

Mumbai is great indeed.
A kadak salaam to all dear friends in mumbai. Tuzee style aawadlee; pun bhasha jara bookish watate. Wadhatyaa likhanabarobar tee aadhikadhik 'bolee' hot jaeel, yaat shanka nahee.
Pun ekunch blog aawadala.
keep writing.

Ganesh Kulkarni said...

Yesss...Mumbai is a different rasayan. When you live in Mumbai, your life runs, not just goes by.
Anyway, good start! Keep it up.

Nandkumar Waghmare said...

ब्लॉग विश्‍वास तुझे स्वागत असो. तुझा लेख आवडला. टिपिकल पुणेकरांना मुंबई कशी वाटते याचा हा नमुना आहे. मात्र तरीही वाचावसा वाटणारा हा लेख आहे. सुरवात तर चांगली झाली आहे. आता बघू पुढे काय होते ते. मात्र, इंटरनेटच्या विश्‍वातील "विश्‍वनाथा' ब्लॉगवर यायला एवढा उशीर का रे केलास. हे काय चांगले नाही. असो. मात्र आता जोरात सुरू हो. आमच्या शुभेच्छा